एसटी बस प्रवाशांच्या खिशाला कात्री! राज्य परिवहन महामंडळाकडून अखेर भाडेवाड
दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी म्हटले आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी (ST) महामंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास अखेर अधिकृत मान्यता दिली आहे. ही सुधारित दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. मात्र, या भाडेवाढीसोबतच महामंडळाने प्रवाशांना एक दिलासा दिला असून, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक आधारासह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा प्रवास फक्त 5 रूपयात; मार्ग अन् वैशिष्ट्ये वाचाच
ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे. एसटीची ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी म्हटले आहे.